Sunday, July 25, 2021

मीराबाई, मितालीराज आणि व्यवसाईकता #सोमवारचाउपहास

 


मी   : मीराबाई... क्या बात है! आज संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. तुझे करिअर मधील यश पाहून आनंदाने, कौतुकाने तुझ्या आई वडीलांचा ऊर आज भरून आला असणार.

ती   : काहीही. कोण ती मीराबाई? आणि ती किती कमवते? तिच्या आई वडिलांचा ऊर आणि bank balance अजून हालला सुद्धा नसेल.

मी   : अरे Chanu Saikhom Mirabai यांनी रौप्य पदक जिंकून....

ती   : ते माहितीये.. पण त्याचा करिअरशी काय सबंध?

मी   : म्हणजे? मणिपूर मधील दुर्गम भागात राहून चुलीसाठी लाकडे गोळा करून आणणारी मुलगी आज जगभरात आपल्या देशाचे नाव मोठे करत आहे... आज प्रत्येक भारतीयाच्या तोंडी तिचेच नाव आहे...

ती   : ते काय? एकेकाळी विजय मल्ल्याचे सुद्धा होते.

मी   : पण मीराबाइंचे नाव अभिमानाने घेतेले जात  आहे.

ती   : काहीही! वेटलिफ्टिंगच्या हमालीला आपण मुळात करिअर म्हणतच नाही. भारतात स्पोर्ट्स मध्ये यशस्वी करिअर करणे फारच अवघड... किंबहुना होतच नाही. (पार्थिव पटेलला विचारा) आणि  कोणामध्ये काय म्हणतात ते talent कि काय ते सापडलंच तर लोकं तोंडावर ओळख देतील याची शाश्वती नाही, पैसा कमवायचं तर दुरच राहिलं (धनराज पिल्लेला विचारा)

मी   : मला काही तुझे पटत नाही. आज मीराबाई संपूर्ण तरुण पिढीची आदर्श आहे, प्रेरणा आहे.

ती   : कसली प्रेरणा आणि कसलं काय? त्या मणिपूरच्या खेड्यात तिच्या आई वडीलांना आयटी क्षेत्र किंवा करिअरच्या विविध संधी काय असतात हेच माहित नव्हत. त्यात मुलगी. म्हणून त्यांनी चालू दिले असणार. आपल्या पुण्या-मुंबईत सुशिक्षित मिडलक्लास मधील किती आया आणि बाप यातून प्रेरणा घेऊन स्वत:च्या मुलाला सांगतील कि तू कॉम्पुटर कोडींग शिकायच्या ऐवजी धावणे, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी किंवा वेट लिफ्टिंग मध्ये जास्त इंटरेस्ट घे? कारण त्यात पैसा नाही. शहरातल्या संस्कृतीत ज्यात पैसा नाही ते करिअर नाही.

मी   : अरे असे नाही.... आज किती तरी जण...

ती   : ‘किती तरी’ पेक्षा नेमके कोण? तर इंजिनिअर, डॉक्टर किंवा बिझनेसमन होण्याची आर्थिक किंवा बौद्धिक परिस्थिती नसलेले... किंवा योग्य मार्ग-संधी माहितीच नसलेले... गावाकडचे. ज्यांना अक्कल आहे ते गप्प कोडींग शिकतात. तू मला सांग ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्यासाठी जेव्हडे कष्ट, चिकाटी वगैरे जे काही लागते तेच कष्ट, तीच जिद्द एखाद्या चांगल्या करिअर मध्ये म्हणजे कोडींग, सोफ्टवेअर यांपासून गेला बाजार सोफ्टस्कील किंवा लाईफकोच पर्यंत अनेक पर्यायांमध्ये वापरली तर कित्येक पटींनी जास्त श्रीमंत व आरामदायी आयुष्य मिळणार.

मी   : अरे पण खेळातला आनंद....

ती   : गप रे... पदक जिंकून काही होत नाही. इतर बर्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते (सुशील कुमारला विचारा). आणि कसे आहे.... धावण्यात आणि उड्या मारण्यात जो पहिला येतो त्याच्याच खायची-प्यायची सोय होवू शकते. कोडींग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, एम्बिए मध्ये आपण पहिल्या दहा हजारात आलो तरी ऐशोआराम नक्की.

मी   :पैसे मिळविणे म्हणजेच यशस्वी करिअर असे नसते.

ती   :ते इतरांसाठी. स्वत:च्या मुलांसाठी नाही. अथ्लेटीक्स मध्ये पैसा नाही म्हणून ते करिअर असूच शकत नाही. म्हणूनच घरातील कर्ता पुरुष जर अथ्लेटीक्स मधे करिअर करत असेल तर त्याला न
मिळालेल्या शहरातील
opportunities हेच त्यामागचे कारण असते. एकवेळ बाप किंवा पतीच्या पाठींब्यावर महिला अथ्लेटीक्स चालून जातंय.

मी   : हे जरा अतीच झाले.

ती   : मग मला दहा पुरुष खेळाडू सांग ज्यांच्यावर पिक्चर आलेला नाही आणि जे अथ्लेटीक्स मधून लौकिकार्थाने चारीथार्थ चालवितात.

मी   : मोहिंदर सिंग गिल, अब्दुल कुरेशी, ..... सीमा पुनिया?

ती   : पाहिलं कोणालाही माहित नाही. खेळायचेच असेल तर क्रिकेट खेळा... तेही पुरुष असाल तरच...

मी   : असे काय... मिताली राज बघ की.... अभिमानास्पद करिअर आणि वल्ड रेकोर्ड ...

ती   : जाहिराती किती मिळतात? उत्पन्न किती? असेच करिअर पुरुष म्हणून असते तर आर्थिक परिस्थिती वेगळी असती कि नाही? स्पोर्ट्स मध्ये महिला brand किंवा मॉडेल होवूच शकत नाहीत.

मी   : काही काय... सानिया मिर्झाला किती जाहिराती मिळाल्या होत्या....

ती   : हो! बाईला जाहिराती साठी नुसते आदर्श टेनिस खेळून चालत नाही त्यासाठी मॉडेलसारखे दिसावे सुद्धा लागते.

मी   : ते ही खरे आहे! मॉडेलींग वाईटच!! म्हणून मी माझ्या नात्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना कोडींगच शिकायला सांगणार आहे. आणि वैदिक गणित. त्याचा फायदा होतो म्हणे कोडींग मध्ये. मॉडेलिंग, राजकारण असल्या डोक्याला कटकटीच नकोत. पाच दिवस काम आणि मस्त विकेंड. शेवटी करिअर जीवनाचा एक भाग असतो, आख्ख आयुष्य नाही.

ती   : समजलं ना.... आयुष्यात प्रोफेशनल म्हणजे व्यवसाईक होता आले पाहिजे...

मी   : खरे आहे... व्यवसाइकता पाहिजे...

ती   : करेक्ट आहे! धंदेवाइकता पाहिजे.... ! 

© स्वरूप गोडबोले

शेरनी, टायगर आणि लोकाश्रय #सोमवारचाउपहास

 शेरनी, टायगर आणि लोकाश्रय

      दैव देते आणि कर्म नेते या म्हणीचे एकदम ताजे उदाहरण म्हणजे अमित मासुरकर यांचा ‘शेरनी’ चित्रपट! विद्या बालन, विजय राज, ब्रिजेंद्र काला, इला अरुण, नीरज कबीर यांच्यासारखे कलाकार कामाला असताना चित्रपट रटाळ झालाय. आता या रटाळ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर लोकाश्रय कसा मिळवून द्यायचा? म्हणून एक छोटी क्लुप्ती वापरली आहे.

बॉलीवूडचा, बॉक्स ऑफिसचा किंग सलमान खान यांचे सुपर-डुपर हिट सिनेमे ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’ यांच्याशी नाते जोडायचा प्रयत्न केलाय. सलमान खान टायगर म्हणून विद्या बालन ‘शेरनी’. अन्यथा चित्रपटाचे नाव ‘शेरनी’ असण्याचे काहीच कारण नाही. पण ‘शेरनी’ टायगरच्या आसपास सुद्धा पोहचू शकत नाही आणि याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत कथानक.

      भारतीय प्रेक्षकाची दाद मिळेल अशा अनेक जागा ‘शेरनी’च्या कथेत नैसर्गिकपणे  निर्माण झाल्या होत्या. मात्र लेखक-दिग्दर्शकाने फारच निराशाजनक कामगिरी केलेली आहे. उदाहरण घ्यायचं म्हणजे नरभक्षक वाघिणीने पहिला बळी घेतल्यावर जेव्हा forest ऑफिसर विद्या बालन तेथे पोहचते तेव्हा तिच्या आधीच लोकाश्रय असलेला एक लोकनेता पोहोचलेला असतो. तो म्हणतो “सरकार ने क्या किया तो एक लेडी अपसर को भेजा है....” इथे नैसर्गिकरित्या एक सिच्युएशन मिळाली होती. विद्याच्या तोंडी एखादा टाळ्यांचा feminist संवाद देता आला असता. लेखकाला तो सुचला नसेल तर दिग्दर्शकाने ट्विटरवर फक्त #feminism सर्च केले असते तरी एखादा उत्तम संवाद मिळाला असता. ते कष्ट घेतले गेले नाहीत. विद्या यावर काहीही न बोलताच तो सीन संपतो. चित्रपटात अशा अनेक हुकलेल्या जागा जाणवत राहतात.

मानव जातीला धोका बनलेल्या नरभक्षक वाघिणीसाठी उंदीर पकडायला वापरतात तसला पिंजरा वापरणारे मूर्ख अधिकारी यात दाखविले आहेत. अशावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून येणारे शिकारी


पिंटू भय्या खर्या अर्थाने हिरो ठरू लागतात. आणि येथेच दिग्दर्शकाचा गोंधळ होतो. कदाचित सध्याच्या असहिष्णू वातावरणात सरकारी अधिकारी कसे चुकीचे आहेत हे ठळकपणे दाखवायचे नाही अशी निर्मात्याची इच्छा असू शकेल. एका सीनमध्ये जंगलाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करण्याचे कारस्थान फोरेस्ट ऑफिसर रचत असतात. जेणेकरून आदिवासींना जंगलापासून तोडता येईल. पण यावर देखील प्रसंग निर्मिती करून सीन अर्धवटच सोडून देणेत आलेला आहे. यावर एकही angry young man/woman आवाज उठवत नाही. दरवर्षी लाखो झाडे लावण्याच्या सरकारच्या योजनेबाबत चित्रपट अर्धवटच माहिती देतो. संथ पुढे जाणारी कथा एका वळणावर between the words कॉमेंट करू पाहते की शेतीमुळे जंगलतोड होत आहे की काय? शेतकऱ्यांच्या देशात शेतकरी भरडला जात असताना, गेले अनेक महिने राजधानीत शेतकरी आंदोलन करत असताना शेतकरी विरोधी कॉमेंट मात्र होते. हे टाळायला पाहिजे होते.

 

मुळात नरभक्षक वाघांचे काय करायचे यावर लेखक-दिग्दर्शक ठाम नाहीत. डायनासोर नष्ट झाल्याने काहीही बिघडले नाही. त्यामुळे माकडाचा माणूस होणेवर काहीही परिणाम झालेला नाही. उद्या वाघ टिकवायचे म्हणून कोणाचे बळी देणार? वाघ, चित्ते, चिमण्या कमी झाल्या म्हणून माणूस, त्याचे घर, त्याच्या गरजा, देशाचा विकास थांबवायचा का? विज्ञान सुद्धा नैसर्गिक आहे आणि विज्ञानाची प्रगती सुद्धा नैसर्गिकच आहे. निसर्ग कि विज्ञान असल्या हा उगाळून उगाळून जुना झालेला प्रश्न आहे. जात, धर्म, भाषा यामध्ये न अडकता सर्व भारतीयांनी एकमताने आपल्या कृतीतून विज्ञानालाच स्वीकारले आहे.

 

उगाळून उगाळून बोरिंग झालेल्या विषयावर देखील उत्तम सिनेमा होवू शकतो आणि याची शेकडो उदाहरणे आहेत. पण चित्रपट बनवताना प्रेक्षकांचा विचार करायला पाहिजे. टायगर सिरीज मध्ये सलमान खानचे चित्रपट गाजतात याचे श्रेय सलमान खानला आहे तसेच याचे श्रेय जाते ते त्यातील कथेचा वेग आणि संवाद. थिएटर मध्ये जेव्हा सलमान खान “शिकार तो सभी करते है लेकीन टायगरसे बेहतर शिकार कोई नही करता” असले संवाद बोलतो तेव्हा अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट होतो. माणसे भारावून जातात. आणि इथेच चित्रपट जिंकतो. प्रेक्षकांना संदेश (किंवा अगदी उपदेश) द्यायचा असेल तर त्यासाठी आधी प्रेक्षक भारावून गेला पाहिजे, त्याच्या मनात खोलवर काहीतरी हलले पाहिजे, त्याच्या भावना चाळवल्या गेल्या पाहिजेत. त्याशिवाय भारतीय माणूस प्रेरणा घेत नाही. पण एकदा का त्याला इमोशनल अपील मिळाले कि मग तो मुद्दा उचलून धरायच्या त्याच्या स्पिरीटला तोड नाही.



ज्याप्रमाणे प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात चित्रपट कमी पडतो तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सुद्धा चित्रपट अयशस्वी होतो. मारामार्यांचे सीन नाहीत. मुठी वळाव्यात असा एकही देशभक्तीवर संवाद नाही. गुणगुणावे असे एकही गाणे नाही. ‘डर्टी पिक्चर’ फेम विद्या बालन मुख्य भूमिकेसाठी असताना तिच्या अभिनयाला, तिच्या सौंदर्याला न्याय देईल असा एकही सीन नाही. मग प्रेक्षकांनी ‘शेरनी’ बघायचा तरी का? भारतीय प्रेक्षक सुज्ञ आहे. त्याने आज पर्यंत योग्य ते सिनेमे हिट ठरवून त्यांना पैसे मिळवून दिले आहेत. कोणत्यातरी फेस्टिव्हलला सिनेमा दाखवून शंभर-दीडशे ओळखीच्या माणसांच्या टाळ्या घेवून ‘नैतिक विजय’ मिळाला तरी त्यास भारतीय समाजात स्थान नाही. प्रेक्षकांचा विचार केलेशिवाय ‘शेरनी’ कधीही टायगर होवू शकत नाही!

© स्वरूप गोडबोले

वय, गाणे आणि कलाकारी #सोमवारचाउपहास

 वय, गाणे आणि कलाकारी 

छम छम करता है ये नशीला बदन... मला आजही आठवतंय कि मी हे गाणे गायले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला होता... एस एम एसेसचा अक्षरशः पाऊस पडला... मी... मी महाराष्ट्राची क़्विन गायिका झाले. तेही वयाच्या केवळ सातव्या वर्षी. मला आठवतंय जेव्हा त्या रिअलिटी शोच्या महाराष्ट्रभर ऑडीशन होत्या तेव्हा दहा हजाराच्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून २० निवडले गेले. आणि मग जनतेनी एस एम एस करून, करून मला पहिला नंबर दिला. तेव्हा फायनलच्या आधी माझे आई, बाबा आणि गुरु मी फायनलला कोणते गाणे गावे याबाबत माझ्या समोरच चर्चा करत होते. गुरूंचा सल्ला होता “पायल बाजे....” तर बाबांना आशा भोसलेचे कोणतेही गाणे चालणार होते. आईचा मात्र भक्तीगीताचा आग्रह होता. त्यांचे काही केल्या एकमत होईना. प्रत्येक जण त्याने निवडलेले कसे चांगले आणि दुसरे कसे वाईट यावर ‘डेलीसोप’ वाद घालत होता. शेवटी त्यांनी मलाच विचारले “तुला कोणते गायचे आहे?” मला काय कोणतेही चालले असते... पण मनातून आता मला त्यापैकी कोणतेच गावेसे वाटत नव्हते. तेवढ्यात तेथे channel चा माणूस आला. त्याने सांगितले कि, “जास्त मेसेजेस हवे असतील तर आयटम सॉंग गा... छम छम करता है” मी गायले. आणि पहिले आले.

तेव्हाच मी ठरविले, करिअरमध्ये आई, बाबा, गुरु.. कोणीही काहीहि म्हणो शेवटी ऐकायचे ते फक्त channel वाल्याचे! रिअलिटी शो मुळे मला माझी कलाकारी दाखवायची एवढी संधी मिळाली. वर्षानुवर्षे रियाझ करणाऱ्याच्या नशिबात सुद्धा अशी संधी व कलाकारी असेलच असे नाही.

अलीकडेच माझे channel वर सकाळी गाणे होते. मग आई भक्ती गीतांचा आग्रह करू लागली. सो मिडल क्लास! मी म्हणाले तिला “हे बघ मुळात कलाकारांना वेळ-काळाच्या मर्यादा नसतात... आणि जमाना बदललाय.... आता पाहटे झोपून उठणारे कमी आणि झोपायला जाणारे जास्त असतात”

आता मी मोठी झाल्यावर एका लहान मुलांच्या रिअलिटी शो ला जज्ज म्हणून जाण्याचे channel मुळेच  मला भाग्य लाभले. आता माझेही फेसबुक, ट्विटर खाते असल्याने मी काही उपद्रवी आणि अरसिक माणसांच्या कमेंट्स वाचल्या. काय तर म्हणे “लहान मुलीने आयटम सॉंग गाऊ नये...” रागच आला मला. मी एका गोंडस लहान मुलीचा “ही पोरगी साजूक तुपातली.....” गातानाचा व्हीडीओ tweet करून पोस्ट केली की “सौंदर्य आणि अश्लीलता पुरषाच्या नजरेत असते”

नाही तर काय. एव्हड्या लहान मुलीला काय कळणारे त्या गाण्याचा अर्थ? आणि कलाकाराला वेळेचे, वयाचे आणि खर्या अर्थाने “सामाजिक व्याकरणाचे” बंधन नसतेच! channel च्या कृपेने मी लहानपणीच ‘कलाकारी’ शिकले. ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन... अगदी चाकोरी बाहेरचे वळण मिळाले. आणि बरका.. यामुळे माझ्या बालपणावर काडीचाही परिणाम झाला नाही. उलट, मला आठवतय, मी रिअलिटी शो जिंकला होता तेव्हापासून माझे सगळे मित्र मैत्रिणी माझ्याशी जास्तच प्रेमाने वागू-बोलू लागले. मी बॉसच झाले. शाळेने देखील मला परीक्षा, गृहपाठ यामध्ये सांभाळून घेतले. आणि मी गायचेच ठरविल्यामुळे गणित कच्चे राहिल्याने माझे काहीही बिघडले नाही.


आणि लहान मुलांनी आयटम सॉंग गायल्यावर संस्कृती वगैरे खराब होत नसतीये हं... म्हणे वयाची जाणीव असावी. आणि आम्हा बालकलाकारांवर टीका कोण करतंय तर घरातल्या टीव्हीवरचे channel घरच्यांना न बदलू देणारे वानप्रस्थाश्रमातील म्हातारे. अहो तुम्हाला या वयात channel सोडवत नाही आणि आम्हा बालकलाकारांना कशाला उपदेश देताय!

आज हे सगळे आठवले कारण आज मी आईच्या आजीच्या माहेरी कोकणातल्या ह्या छोट्याशा गावात दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला गायन-सेवा करायची संधी मिळाली म्हणून आले होते. आज येथे देखील, खास लोक-आग्रहास्तव मी सगळ्यांचे लाडके “छम छम करता है” गायले...आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

दिलेल्या संधीसाठी मी मनोभावे दत्ताच्या पाया पडले. औदुंबराला प्रदिक्षिणा मारताना मनातून channel चे देखील आभार मानले.

© स्वरूप गोडबोले.

 

कोक, पाटकर आणि क्रिकेट #सोमवारचाउपहास

 “कोक नको, फक्त पाणी दे....” वेटरला फर्मान देत त्याने पुढचा भरला.

लॉकडाऊन मुळे क्रिकेटच्या मॅचेस जवळ जवळ बंद झाल्या होत्या. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती फारच खालावली होती.
“मॅचेस नाहीत तर पैसा नाही. च्याआयला मग करायचं काय?” त्याने वैतागून क्रिकेटच्या देवालाच विचारले.
“हे पहा लक्षात ठेव.... खरा खेळाडू खेळावर फक्त श्रद्धा ठेवतो. तो पैसे कमविण्यासाठी कायमच इतर मार्ग वापरतो. जोड धंदे करतो.” देवाने खुलासा केला.
“म्हणजे काय करायचे?”
“क्रिकेट काही २४ तास नसते. त्यातून थोडा वेळ काढायचा आणि मिळेल ते विकायचे. मग आपोआप डकवर्थ लुईस च्या पलीकडे जाऊन गणिते जुळतात. मी हि तेच केले. क्रिकेटने जेव्हडे दिले त्यापेक्षा कित्येक पटींनी मी वेगवेगळ्या गोष्टी विकून पैसा कमविला.”
“तु तर देव... तुला काय पैशाचे कौतुक?” त्याने तोंडात फरसाण कोंबत विचारले.
“अरे नुसते देवत्व मिळून काय फायदा... उद्या इतर कोणी विराट पराक्रम केला तर हि भाबडी जनता त्याला देव मानतील. रिटायरमेंट ला समजत कि करिअर म्हणजे शेवटी किती पैसा कमविला इव्ह्डेच”

“देवा अरे तू तर मगाशी खेळावरची श्रद्धा वगैरे बोलत होतास...”
“श्रद्धा खेळावर आहेच रे... पण आता एव्हडा क्लायमेट चेंज झालाय कि देव असलो तरी एसी शिवाय आता बसवत नाही रे कुठे..... फिटनेस पाहिजे. तू काय करतो फिटनेस साठी?”
“रोज सकाळी उठल्यावर आधी एक लिटर पेप्सी पितो. पोट एकदम साफ होतय. आणि मग कोणत्यातरी क्लब वर जाऊन दे दना दे दन ठोकायच्या.... गप्पा... म्हणजे यामुळे मन प्रसन्न राहतंय. देवा, तुम्ही मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करता?”
“मी ब्रांडेड वस्तू वापरतो.... भारीतला टीव्ही, महागतला मोबाईल...”
“फक्त ब्रांडेड!! मजा आहे... पण सगळ्यांना कसं परवडणार?” त्यने पुढचा भरला.
“अरे आपण क्रेडीट कार्ड सुद्धा विकतो ना.....”
“काय सांगता? विकता? मग क्रिकेट चे काय?”
“अरे क्रिकेटवर श्रद्धा आहेच. पण इतर वेळी मार्जिन चांगले मिळाले कि मिळेल ते विकतो...”
“देवा पण... देवाने त्याची इमेज सांभाळून, त्याच्या दर्जाच्या, चांगल्या, समाजाचा फायदा होईल अशाच वस्तू विकल्या पाहिजेत ना....”
“हे बघ मी काय कोणाला फोर्स करत नाही कि यानीच दात घासा, हेच कपडे घाला, हाच विमा घ्या किंवा हाच मोबाईल, गाडी घ्या. तो तर माणसांचा चोईस असतो. त्याचा माझ्याशी काय सबंध”
“देवा, तुम्ही ज्या गोष्टी वापरत नाही त्या सुद्धा विकता ?”
“तू फारच आदर्शवादी होतोहेस... तुला आदर्श कोणाचे ठेवायचे ते तरी कळते का?”
“देवा तुम्हाला पाटकर माहिती आहेत ना?” त्याने चाचरतच विचारले.
“फारच विनोदी व्यक्तिमत्व.... उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे... पाटकर म्हणजे हशा....फारच विनोदी आहे आयुष्य त्यांचं”
“काय सांगता... मला तर वाटल होत कि ती बाई म्हणजे.....”
“बाई? कोण बाई? विजय पाटकर आता बाई झालाय? कलियुगात काही खरे नाही. आता ऑक्सिजन परवडत नाहीरे. असो. तुला सांगतो आता करोना संपला... आता वातावरण पार बदलून गेलय, अजून बदलत जाईल... मग बघ सगळीकडे भरपूर काम आणि नुसता पैसा. मग काय ह्या पैशाचे करायचे काय?? ही माणसे आपलाच माल विकत घेतील आणि घरी जाऊन मॅचेस बघत बसतील...”
“खरे आहे देवा, क्रिकेटची नशाच वेगळी. त्याने माणूस सगळी टेन्शन विसरून जातो..... एकदा मॅच चालू झाली कि भूजल पातळी, बेसुमार पाणी उपसा, मरायला आलेल्या नद्या, बदललेला पाऊस, वाढलेले तापमान, प्रदूषण सगळ विसरून क्रिकेट मध्ये रमतोय बघा...”
“आणि एकदा क्रिकेट चालू झाले कि तू पैसा कमविणारच की....”
खुद्द देवानेच अशा दाखविल्यावर तो एकदम खुश झाला... त्याने घाईघाईत पुढचा भरला...
“अरे थांब घाई करू नकोस. देव मानतोस ना मला? मग ऐक जरा. अशी पाण्यातून पिऊ नकोस. आजकाल पाणी पुर्वीसारखे स्वच्छ नसते... जरा कोक किंवा पेप्सीतून पीत जा....”
त्याने देवाचे ऐकले. कोक मागविले. तो देवाचे ऐकणारच होता.
तो वयाने लहान, आणि ते मोठे असेल तरी दोघे एकाच अड्ड्यावरचे बुकी. तो शिष्य होता आणि तो त्यांना आपला गुरुच नाही तर क्रिकेट बेटिंग मधला देव मानत होता. क्रिकेटच्या विश्वात पैशासाठी रोज नवा ‘पण’ लावणारे ते दोन बुकी....... लोकांना नवी स्वप्ने विकणारे आज कोक पिऊन आनंद साजरा करत होते..
© स्वरूप गोडबोले.